ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचांच्या संपत्तीत घट, उत्पन्न मात्र वाढलं, बायकोकडून घेतलं लाखोंचं कर्ज!
मिहीर कोटेचा हे भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार आहेत. दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे.
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांची संपत्ती 2019च्या तुलनेत जवळपास अर्धी झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येत आहे. 2019मध्ये विधानसभा लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कोटेचा यांच्याकडे 15.17 कोटींची जंगम तर 3.49 कोटींची स्थावर मालमत्ता होती. तसेच त्यांच्यावर 15.62 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पत्नीकडे 85 लाख रुपयांची जंगम मालमत्ता होती. तर त्यांच्या नावावर कुठलीही जंगम मालमत्ता अथवा कर्ज नव्हते. मात्र काल दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कोटेचा यांची जंगम मालमत्ता 7.23 कोटी रुपये, स्थावर मालमत्ता 3.65 कोटी रुपयांची असून पत्नीच्या जंगम मालमत्तेत किंचित वाढ होऊन ती 1.23 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कोटेचा यांच्या पत्नीकडे 2.43 कोटी स्थावर मालमत्ता आहे.
संपत्ती घटली तरी उत्पन्न मात्र वाढले
दरम्यान मिहीर कोटेचा यांची संपत्ती घटली तरी त्यांच्या उत्पन्नात तीन पटीने वाढ झाली आहे. 2018- 19 मध्ये कोटेचा यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान 47 लाख 97 हजार उत्पन्न दाखविले होते. त्यात वाढ होऊन आता एक कोटी 51 लाख रुपये झाले आहे.
पत्नीकडूनही घेतले कर्ज...
मिहीर कोटेचा यांनी पत्नीकडून 42 लाख 65 हजार 228 रुपयांचे कर्ज घेतले आहे. 2024 पर्यंत पत्नीचे कर्ज 20 लाख 19 हजार पर्यंत आले आहे. एकूण कर्जाची रक्कम 7 कोटी 37 लाख 95 हजारांवर आली आहे.
74 तोळे सोने दीड किलो चांदी
कोटेचा यांच्याकडे 2019 मध्ये 3 लाख 18 हजार किंमतीचे सोने तर पत्नीच्या नावे 22 लाखांचे सोने आणि 17 लाखांचे हिरेजडित दागिने असल्याचे नमूद होते. 2024 मध्ये दागिन्याच्या किंमतीत वाढ होत हा आकडा एकूण पावणे एक कोटींवर गेला आहे. कोटेचा दाम्पत्यकडे एकूण 74 तोळे सोने, दीड किलो चांदी आणि हिरेजडित दागिने आहे.
इशान्य मुंबईत संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा यांच्यात लढत
दरम्यान, या मतदारसंघात मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे. हा मतदारसंघ जिंकणे हे महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे मिहीर कोटेचा हेदेखील येथून विजय मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येथून कोण विजयी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
माधवराव शिंदेंच्या मृत्यूबाबत उदयनराजेंचं मोठं विधान, काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले...
30 एप्रिलला मोदींची धाराशीवमध्ये सभा, सहा तास धाराशिव-तुळजापूर महामार्ग राहणार बंद!